जरुर बघावा असा गौताळा अभयारण्यातला "अंतुर" चा किल्ला

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हा हा लेण्यांनी नटलेला आहे. या जिल्हातील जगप्रसिध्द अजंठा लेणी ही, सह्याद्रीच्या अजंठा रांगेत कोरलेली आहे. या अजंठा रांगेत अनेक किल्ले आहेत, यापैकी सर्व किल्ल्यांचा राजा अंतुर किल्ला आहे.परंतु काळाच्या ओघात ते दुर्लक्षित झाले. त्यांची माहितीच नसल्याने पर्यटक तेथे फिरकतही नाहीत.
का व कुणी बांधला अंतुरचा किल्‍ला ?
कन्नड तालुकातील अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम उपरांगेत अंतुरगड आहे. हा रस्‍ता म्‍हणजे खानदेशातून मराठवाड्यात प्रवेश करण्यासाठी कन्नड, वेरूळ, दौलताबाद हा पूर्वीच मार्ग. त्‍यासाठी या प्रदेशातून खडक कोरून रस्ता करण्यात आला. पण, या मार्गातून येणाऱ्या शत्रूला रोखता यावे यासाठी यादवांनी याच कोरलेल्या दगडांतून किल्ला बांधला.

जंजाळा किल्‍ल्‍याप्रमाणे हाही भूदुर्ग आणि गिरीदुर्ग या दोन्‍ही प्रकारातील किल्‍ला आहे. नागापूर-खोलापूर या रस्त्याने गेल्यास भुईकोट प्रकारात तो तर नागद-बेलखेडा-गोपेवाडी या रस्त्याने गेल्यास अंतूरचा माथा गाठण्यासाठी तब्बल अडीच तासांची चढाई करावी लागते. अंतूर किल्ल्याचं वैशिष्टय म्हणजे apan त्याच्या जवळ जाईपर्यंत येथे भव्‍य वास्‍तू आहे, हेच दिसत नाही. मात्र, जसंजसे आपण पुढे जावू तस-तसे समोरचे दृश्य दिसते आणि अथांग सागरातून एखादे बुडालेले प्रचंड जहाज वर यावे तसा गर्द जंगलाने वेढलेला अंतूर किल्ला आपल्याला दिसतो.

पहाण्याची ठिकाणे :
अंतुर किल्ल्यावर नागापूरहुन वहानाने किंवा गोपेवाडीतून चालत आल्यास आपण किल्ल्याच्या भव्य बुरुजाजवळ पोहोचतो (इथेच वहानतळ बनवलेला आहे). येथून सिमेंटच्या पायवाटेने किल्ल्याचा पहिल्या दरवाजाकडे जातांना वाटेत डाव्या बाजूस पहार्‍याची चौकी दिसते. पायवाटेच्या वरच्या बाजूस काही बुरुज दिसतात. त्यात एक तिहेरी बुरुज आहे. पुढे थोड्या पायर्‍या चढल्यावर पहिला दरवाजा लागतो.हा दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. दरवाजाच्या समोर एक दगडी तोफगोळा पडलेला दिसतो. दरवाजाच्यावर कमानीच्या दोन बाजूला असलेल्या कोनाड्यात पूर्वी शरभ होते. आता फक्त उजव्या कोनाड्यातील शरभ शाबुत आहे. दरवाज्यातून पुढे जाणार्‍या वाटेच्या दोन्ही बाजूला तटबंदी आहे. यावाटेने चालत जाऊन डावीकडे वळल्यावर आपण दुसर्‍या दरवाज्यापाशी पोहोचते. पहिल्या दरवाजाला काटकोनात असलेला हा भव्य दरवाजा पूर्वाभिमुख आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूचे बुरुज चौकोनी आहेत. दरवाजाच्या कमानीत शत्रुवर मारा करण्यासाठी (गरम तेल/ निखारे यांचा) खाचा ठेवलेल्या आहेत. आतमध्ये पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. या दरवाजाच्या आतील बाजूस २ कमळपुष्पे कोरलेली आहेत आणि ४ तोफगोळे दरवाजावर लावलेले आहेत. दुसर्‍या दरवाजातून आत आल्यावर पायर्‍यांची वाट काटकोनात वळून तिसर्‍या दरवाज्यापाशी जाते. हा दरवाजा सुध्दा दक्षिणाभिमुख आहे. कमानीवर कमळपुष्पे कोरलेली आहेत. कमानीवर मध्यभागी ५.५ फ़ूट लांब व २ फुट रुंद फारसी लिपीतील शिलालेख आहे. कमानीवर जाण्यासाठी आतल्या बाजूने पायर्‍याही आहेत. दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडे एक उध्वस्त वास्तु आहे. त्यात काही कोरीव दगड पडलेले आहेत.किल्ल्याच्या आत खडकातच कोरलेला पाण्याचा हौद आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी या तलावात साठविण्यात येई. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर दुसरा दरवाजा लागतो. त्याच्या आतल्या भागात दरवाजाच्या माथेपट्टीवर बुऱ्हाण निजाम शहा यांचा शिलालेख आहे. दरावाजातून पुन्हा आत गेल्यानंतर विस्तीर्ण मैदान लागते. मैदानातच मोठा तलाव आहे. त्याच्या काठावरच निजाम शहा कालीन मशीद आहे. डावीकडे बालेकिल्ल्यावर एका सुफी संताची कबर आहे. तलावाच्या वर उंचावर शस्त्रास्त्रांचा साठा करण्यासाठी 'शस्त्रागार' आहे. या इमारतीचे भग्नावशेष आता या परिसरात विखुरलेले आहेत. उत्तर तटावर तटबंदीमध्ये बुऱ्हाण निजामशहाचा शिलालेख आहे. या तटबंदीजवळ उभे राहताच या किल्ल्याचे भौगोलिक, राजकीय महत्त्व लक्षात येते. येथून प्रचंड खोल खानदेशाची सपाट विस्तीर्ण जमीन दृष्टीस पडते.

दरवाजातून आत शिरल्यावर समोर तलाव दिसतो. तर उजवीकडे जाणारी वाट एका बाजूला किल्ल्याची तटबंदी आणि राजवाडा यामधून पुढे जाते. या राजसंकुलात जाण्यासाठी छोटे प्रवेशव्दार आहे. आत दोन मोठे वाडे बांधलेले दिसतात. यांच्या वर घुमट आहेत. एका वाड्याच्या वर जाण्यासाठी पायर्‍याही कोरलेल्या दिसतात. या वाड्याच्या मागे काही थडगी आहेत. वाड्यातून बाहेर पडून पश्चिम टोकाकडे चालत जातांना वाटेत एक दर्गा दिसतो. पुढे चौकोनी आकाराचा सुटा टेहळणी बुरुज आहे. त्यावर चढायला पायर्‍या आहेत. या बुरुजावरून संपूर्ण किल्ला दिसतो. बुरुज पाहून तलावाजवळ यावे. या तलावातील पाणी खराब झालेले आहे. या तलावाच्या एका बाजूला गोदी नावाचा दर्गा आहे. वाड्याच्या विरुध्द दिशेला तलावाच्या दक्षिणेला एक भव्य दरवाजा आहे. हा दरवाजा इथे बांधण्याचे प्रयोजन मात्र कळत नाही. प्रवेशव्दाराच्या मागिल बाजूस पडक्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. हे सर्व पाहून पश्चिमेकडे दिसणार्‍या बुरुजाकडे चालत जातांना दोन उध्वस्त वास्तु लागतात त्यातील तलावाजवळील तळघर असलेली वास्तू म्हणजे दारुखाना असावा. बुरुजापासून तटबंदीच्या कडेकडेने उतरणारी वाट आपल्याला कातळाच्या पोटात कोरलेल्या टाक्यांपाशी घेऊन जाते. येथे चार खांब टाकी कोरलेली दिसतात. त्यापैकी एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यांच्या वरच्या बाजूला एक कोरडा बांधीव तलाव आहे.

टाकी पाहून परत बुरुजापाशी येऊन किल्ल्याच्या दक्षिणेकडील निमुळत्या भागाकडे चालायला सुरुवात करावी. इथे एक विशेष गोष्ट जाणवते ती म्हणजे या भागाला किल्ल्यापासून विभागणारी एक तटबंदी आणि २ बुरुज बांधलेले आहेत. या तटबंदी मधून पलिकडच्या बाजूला जाण्यासाठी एक दरवाजा काढलेला आहे. आत प्रवेश केल्यावर आपण गडाचे दक्षिणेकडचे टोक गाठतो. या भागात एक तोफ पडलेली दिसते. त्याच्या समोरच तटबंदी आणि मागचा बुरुज यामध्ये एक छोटीशी खोली आहे. बाजुलाच एक दरवाजा व आतमध्ये पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. हा भाग म्हणजे अंतुर किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेला भव्य बुरुज. हा बुरुज आणि समोरचे पठार यात ५० फुटाचे अंतर आहे. मोठ्या डोंगर रांगेपासून किल्लावेगळा करण्यासाठी येथे कातळ फ़ोडून ५० फ़ुटाचा खंदक निर्माण करण्यात आलेला आहे आणि या खंदकाच्या किल्ल्याच्या बाजूला भव्य बुरुज बांधून किल्ला मजबूत केलेला आहे. सध्या या बुरुजाच्या आत गैबनशाली बाबाचा दर्गा आहे. आत शिरल्यावर बुरुजावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. बुरुजावरुन समोरचे पठार आणि वहानतळ दिसतो.

अंतुर किल्ल्यापासून नागापूरला जातांना रस्त्याच्या खालच्या बाजूस डावीकडे एक पूरातन मैलाचा दगड दिसतो. त्यावर फ़ारसी भाषेत चार शहरांना जाणारे मार्ग दाखवलेले आहेत.
अंतुर किल्ला दुर्लक्षित असला तरी किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत. संपूर्ण किल्ला व्यवस्थित बघायचा असेल तर दोन ते तीन तास लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
अंतुर किल्ला हा महाराष्ट्राच्या जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर बसलेला आहे. इथे वहानाने पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत.

१) औरंगाबाद मार्गे :- औरंगाबाद मार्गे कन्नड गाठावे. कन्नड - नागापूर अंतर २० किमी आहे. कन्नडहुन नागापूरला जाण्यासाठी एसटी बस किंवा जीप मिळू शकतात. वनखात्याने नागापूर पासून अंतुर किल्ल्यापर्यंत कच्चा रस्ता केल्यामुळे. पावसाळा सोडून इतरवेळी वहानाने थेट किल्ल्यापर्यंत जाता येते.

एसटी बस किंवा जीपने नागापूर गावात उतरल्यास :- नागापूर गावातून ३ किमी अंतरावर कोलापूर नावाचे गाव लागते. इथपर्यत नागापूर पासून पोहचण्यास पाऊण तास पुरतो. पुढे कोलापूर पासून किल्ल्याच्या पायर्‍या गाठण्यास दीड तास लागतो. कोलापूर गाव मागे टाकल्यावर दहा मिनिटात वाट डावीकडे वळते. इथून १५ मिनिटे चालल्यावर उजवीकडे एक मारुतीची मूर्ती लागते. या मूर्तीच्या समोरुन वाट डोंगराच्या डावीकडून पुढे सरकते. लक्षात ठेवण्यासारखी खूण म्हणजे ही वाट डोंगराच्या नेहमी डावीकडूनच पुढे जाते. पुढे एका डोंगरावर घुमटीसारखा भाग दिसतो. पण तिथे वर न जाता पुन्हा डोंगराला डावीकडून वळसा घालत वाट दरीपर्यंत येऊन थांबते. इथून अंतुरचे प्रथम दर्शन होते. दर्शन घेऊन पुन्हा अंतुरच्या दिशेने चालत सुटायचे. वाट किल्ल्याच्या समोर असणार्‍या पायथ्याशी येऊन पोहचते. वर न चढता उजवीकडे जंगलात पठाराला डावीकडे ठेवत जाणारी वाट धरायची आणि १० मिनिटातच डावीकडे एक पहारेकर्‍यांची देवडी लागते. २ मिनिटातच गडाचा पहिला दरवाजा दिसतो. नागापूर पासून पहिल्या दरवाज्या पर्यंत पोहचण्यास दोन ते अडीच तास लागतात.

२) चाळीसगाव मार्गे :- चाळीसगाव - सिल्लॊड रस्त्यावर नागापूर गाव आहे. चाळीसगावपासून ४० किमी अंतरावर नागापूर आहे. वनखात्याने नागापूर पासून अंतुर किल्ल्यापर्यंत कच्चा रस्ता केल्यामुळे. पावसाळा सोडून इतरवेळी वहानाने थेट किल्ल्यापर्यंत जाता येते.
३) सगळ्यात मस्त आपली बाईक घेऊन जाणे...तेही गौताळा अभयारण्यातून
धन्यवाद
प्रकाश अ.ताकटे

No comments:

Post a Comment

Adbox

@templatesyard